किल्लेमच्छिंद्रगड (सांगली) - सततच्या पावसाने नरसिंहपूर (ता. वाळवा) येथील ऊस पिकात गुडघाभर पाणी साचल्याने पीक हातचे जाऊन जमीन क्षारपडीची भीती व्यक्त होत आहे. शेतकऱ्यांच्या हाती फक्त उसाचे वाडेच राहण्यासारखी स्थिती आहे. सऱ्यांमध्ये पाणी साचल्याने यंदा ऊस लागवडीचा खर्च निघणार नसल्याने शेतकरी चिंतेत आहे. कोरोनासह पावसाचे संकट कोसळल्याने बळीराजा मात्र पुरता हवालदिल झाला असून, त्याला आर्थिक अडचणींचा सामना करावा लागणार आहे.
नरसिंहपूरमध्ये पूर्वपरंपार उसाचे पीक घेतले जाते. पीक पद्धतीत बदल न केल्याने तसेच भूगर्भातील रचनेचे आकलन केले नसल्याने क्षारपड जमिनीची समस्या मोठ्या प्रमाणात तयार झाली आहे. वरून जरी जमिनी सुदृढ दिसत असल्या तरी आतून त्यांचे आरोग्य बिघडले आहे. तीन फुटांच्या खाली पाण्याचा निचरा होत नसल्याने मातीस तेलकट चिकटपणा आला आहे.
भूगर्भात काळा पाषाणजवळ असल्याकारणाने पाणी जिरणे थांबून क्षारपडीची समस्या तयार झाली आहे. त्याचा परिणाम म्हणून पावसाळ्यात जमिनी जलमय होऊन नापिकीच्या संकटाने गावास घेरल्याचे दिसून येते. राज्य शासनाने चालू वर्षी क्षारपड जमीन सुधारणा योजना जाहीर केली आहे. योजनेत भाग घेऊन क्षारपड जमीन सुधारणा केली तर गावच्या क्षारपड जमिनीची समस्या निकाली निघेल.
अन्यथा वर्षानुवर्षीच्या उसपीक शेतीचा पर्याय अवलंबल्यास नजीकच्या काळात सोन्यासारखी पिके देणाऱ्या जमिनी वालुकामय होतील, अशी परिस्थिती असल्याचे काही शेतकऱ्यांनी सांगितले. हीच परिस्थिती तालुक्यातील शिरटे, येडेमच्छिंद्र, कोळे, किल्लेमच्छिंद्रगड, ताकारीपासून रेठरे हरणाक्षपर्यंतच्या शेत शिवाराची आहे. पाण्याचा अतिरेक झाल्यामुळे यंदा गुंठ्यास अर्धा टन तरी उतारा मिळेल की नाही, याची शाश्वती नसल्याची खंत शेतकऱ्यांनी व्यक्त केली.
संपादन - राहुल पाटील
from News Story Feeds https://ift.tt/2QjUrNz
